Join us

‘वसंतदादा’चा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: September 13, 2014 05:10 IST

वसंतदादा साखर कारखान्याकडे जुलै महिन्याचे साडेसहा लाखांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणने गुरुवारपासून संपूर्ण कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे जुलै महिन्याचे साडेसहा लाखांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणने गुरुवारपासून संपूर्ण कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प झाले असून येथील साडेचारशे कुटुंबीय दोन दिवसांपासून अंधारात आहेत.आशिया खंडातील सर्वांत मोठा साखर कारखाना म्हणून एकेकाळी नावलौकिक मिळविलेला वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. मागील गळीत हंगामातील शेतकऱ्यांचे ४५ कोटींचे ऊस बिल थकीत आहे. उसाची बिले आणि कामगारांची चार कोटींची देणी भागविण्यासाठी कामगार आयुक्त आणि साखर आयुक्तांच्या आदेशाने मिरजेच्या तहसीलदारांनी कारखान्याला मालमत्ता जप्तीच्या दोन नोटिसा बजावल्या आहेत. साखर गोदामालाही सील ठोकण्यात आले आहे. शिवाय, कारखान्यावर जिल्हा बँकेचेही ७८ कोटींचे कर्ज आहे. थकीत देणी देण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य शासनाने जागा विक्रीस मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)