ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - रिझर्व बँक इंडियाने पुढील वर्षी म्हणजेच २०१५ पर्यंत प्लॅस्टिकची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला कोच्ची, म्हैसूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जाणार असून यानंतर उर्वरित देशात या नोटा चलनात आणल्या जातील.
रिझर्व बँकेने जानेवारीमध्ये प्लॅस्टिकच्या नोटा छापण्यासाठी कंत्राट दिले होते. रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात या प्लॅस्टिकच्या नोटा २०१५ मध्ये चलनात आणल्या जातील असे म्हटले आहे. कागदी नोटा लवकर खराब होत असल्याने आरबीआयने प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याचा निर्ण घेतला होता. या नोटांवर डाग लागत नाही व लवकर फाटतही नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या नोटांची नक्कल करणे कठीण आहे. या प्लॅस्टिकच्या नोटा पुढील वर्षीपासून चलनात आणल्या जाणार असून सुरुवातील कमी किंमतीच्या आणि चार शहरांमध्येच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्या जातील. यानंतर कालांतराने नोटांचे मूल्य वाढवले जाईल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.