मुंबई : देशातील १० लाख बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्क्यांची पगारवाढ आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी असा लाभ आजपासून लागू झाला असून इंडियन बँक असोसिएशनने या संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष टीएम बसिन यांनी सांगितले की, वेतन करार आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या या दोन्ही कराराची अंमबजावणी सुरू झाली आहे. या सुट्टयांचा थेट परिणाम ग्राहकसेवेवर होणार आहे. बँकांचे कामकाज १०० टक्के संगणकीकृत असले तरी धनादेश अथवा आरटीजीसी - एनईएफटीमार्फत होणारे कोणतेही क्लिअरिंग होणार नाही. बँक कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०१२ अशा पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकबाकीची (अॅरियर्स) रक्कम मिळणार आहे. ३१ मे पासून ही थकबाकी बँक कर्मचाऱ्यांना मिळेल. १५ टक्क्यांच्या या नव्या वेतनवाढीमुळे बँकांच्या वार्षिक खर्चात ८४०० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. वेतनवाढीच्या खर्चाची तजवीज केली असल्याचा दावा बँकांनी केला आहे. यापूर्वी २००७ मध्ये बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली होती. नवी वेतनवाढ ही २०१७ पर्यंत लागू असेल. (प्रतिनिधी)
बँक कर्मचाऱ्यांना पगारवाढ, सुट्या लागू
By admin | Updated: May 26, 2015 00:09 IST