Join us

शाहूवाडी तालुक्यात पॅचवर्कचे काम जोरात

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

रस्ते पुन्हा खराब होऊ नयेत यासाठी दर्जाची गरज

रस्ते पुन्हा खराब होऊ नयेत यासाठी दर्जाची गरज
बांबवडे : पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याचे पॅचवर्कचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. असे असले तरी पॅचवर्क करण्याची वेळ का येते याचे कोडे सोडविण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी धांदल सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्ते लवकर खराब होतात. नवीन रस्त्यांचे काम सुरू करत असताना पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. नवीन केलेल्या रस्त्यात चढ-उताराकडे लक्ष न दिल्याने रस्त्यात पाणी साचते व ते लगेच खराब होतात.
रस्त्याचे काम सुरू असताना त्यामध्ये पारदर्शकता आहे असे भासविण्यासाठी व्यवस्थित व संथगतीने काम सुरू असते; परंतु डांबरीकरणाचे काम सुरू झाले की, त्या कामास इतकी गती येते की, काही वेळा पुढे काम सुरू व पाठीमागे रस्ता उचकटलेला असतो. त्यावर कारपेटचा थर टाकत असताना दुरुस्त केला जातो. त्यातून राहिलेला रस्ता सिलकोटमध्ये ओढून काढला जातो. डांबरीकरणाच्या कामात इतकी तत्परता दाखविण्याचा हेतू सर्वसामान्यांना समजत नसला तरी त्यामध्ये अधिकारी व ठेकेदारांचे हित लपलेले असते. एवढे ओळखण्याची क्षमती आता सर्वसामान्य लोकांमध्ये नक्कीच आहे. मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर असते, पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
-------------------
चौकट :
बांधकाम विभाग पावसाळा संपल्यानंतर जेथे जेथे रस्ते खराब झालेले आहेत तेथे पॅचवर्कचे काम स्वत: हाती घेते. खड्ड्याच्या आकारावर त्याचा देखभाल खर्च ठरविला जातो. मुदत संपलेल्या रस्त्याचा खर्च शासनाला करावा लागतो, तर मुदतीपूर्वी खराब झालेल्या रस्त्यांचा देखभाल खर्च संबंधित ठेकेदाराला भरावा लागतो.