मुंबई : कच्च्या तेलाचे भाव उतरल्याने आणि चीनमध्ये शेअर बाजार गडगडल्याने भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही तेजी कायम होती. विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने, तसेच ईपीएफओने गुंतवणूक सुरू केल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, आरोग्य सेवा, आॅटो आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स नफ्यात राहिल्याने बाजाराला बळ मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) गुरुवारी दिवसअखेर ७५.०५ अंकांनी वधारत २८,२९८.१३ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २०.७० अंकांनी झेप घेत ८,५८८.६५ वर पोहोचला.इतर उदयोन्मुख बाजाराच्या तुलनेत भारताची कामगिरी चांगली होत आहे. कच्चे तेल आणि चीनच्या शेअर बाजारात घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजाराला आणखीनच बळ मिळाले, असे जियोजीत बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेजचे संशोधन विभागप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. बीएसई-३० निर्देशांकातील १७ शेअर्स फायद्यात राहिले. यात डॉ. रेड्डीज, ल्युपिन, सनफार्मा आणि सिप्लाचा समावेश आहे. तसेच एल अॅण्ड टी, टाटा मोटर्स, टीसीएस, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँकेचे शेअर्सही नफ्यात राहिले. तथापि, आयटीसी, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांता, विप्रो, भारती एअरटेल, एनटीपीसीचे शेअर्स घसरले. एकूण १५३२ शेअर्स तोट्यात राहिले, तर १३९१ शेअर्स नफ्यात राहिले. ११२ शेअर्सचे भाव जैसे थे होते.
खरेदीच्या जोरावर तेजी दरवळली
By admin | Updated: August 6, 2015 22:31 IST