नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले त्यांच्या कर्जाची फेररचना करण्यास रिझर्व्ह बँकेने बँकांना बुधवारी सांगितले.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. उत्तर आणि दक्षिण भारतात गेल्या महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११३ लाख हेक्टरवरील रबी पिकाचे नुकसान झाले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्त भरपाई देण्याची घोषणा केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळावी यासाठी बँकांनी निकष सोपे करावेत, असेही सांगितले. शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यासाठी विमा कंपन्यांनी पुढाकार घेण्यासही मोदी यांनी सांगितले. पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्यासच भरपाई हा निकष कमी करून आता ३३ टक्के पीकहानी झाल्यासही भरपाई दिली जाईल व पर्यायाने अधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्याला भरपाई देण्यासाठीचा निकषही वाढविण्यात आला आहे. भरपाईची रक्कम दीड पट वाढविण्यात आली आहे. आधी जर त्याला १०० रुपये मिळत असतील तर आता ते १५० रुपये मिळतील. म्हणजे भरपाई ही ५० टक्क्यांनी वाढविण्यात आली असल्याचे मोदी म्हणाले.
कृषी कर्जांची फेररचना करण्याचे बँकांना आदेश
By admin | Updated: April 9, 2015 00:21 IST