मुंबई : बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने आज मांडलेल्या पतधोरणाच्या माध्यमातून रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली आहे. यामुळे कर्ज स्वस्त होणार असे मानले जात असले तरी. व्याजदरातील या कपातीचा फायदा जर बँकांनी ग्राहकांना दिला तरच तो ग्राहकांना मिळणार आहे. २०१५ च्या वर्षात १५ जानेवारी आणि ४ मार्च अशा दोनवेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने पाव - पाव टक्का अशी एकूण अर्धा टक्का कपात झाली आहे. पहिल्यांदा दरवाढी झाली त्यावेळी एकाही बँकेने हा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविला नव्हता. यानंतर झालेल्या दर कपातीनंतरही अनेक दिवस बँकांनी हा लाभ ग्राहकाला मिळू दिला नाही. मात्र, जर लाभ ग्राहकाला मिळणार नसेल तर व्याजदर कपातीचा पुर्नविचार करावा लागेल असे इशारा गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिल्यानंतर देशातील विविध प्रकारच्या अशा १४० पैकी फक्त २१ बँकांनीच व्याजदरात कपात केली व ग्राहकांना हा लाभ दिला. परंतु, बँकांचे थकीत कर्जाचे प्रमाण आणि एकूण व्यवहार खर्च या पार्श्वभूमीवर आता किती बँका दर कपात करतील याकडे कर्जदारांचे लक्ष लागले आहे.आज झालेल्या दर कपातीनुसार बँकांनी दर कपात केलीच तर त्याचा जास्त लाभ हा नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. तर सध्या ज्यांचे कर्ज सुरू आहे अशा ग्राहकांना मात्र हा लाभ प्रत्यक्षात न मिळता त्यांच्या कालवधीत कपात करण्याच्या रुपाने मिळणार आहे. दरम्यान, शिखर बँकेने मांडलेल्या अंदाजात महागाई दरात वाढ केली आहे. (प्रतिनिधी)