Join us

केवळ आश्वासनांवर देशात परदेशी गुंतवणूक येणार नाही

By admin | Updated: February 6, 2016 03:02 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार मोठ्या संख्याबळावर सत्तारूढ झाल्यानंतर भारतीय उद्योगांना चालना मिळेल, असा आशावाद होता.

बेंगळुरू : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार मोठ्या संख्याबळावर सत्तारूढ झाल्यानंतर भारतीय उद्योगांना चालना मिळेल, असा आशावाद होता. पण प्रत्यक्षात तसे झालेच नाही, अशी खंत उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे, तर केवळ आश्वासनांवर देशात परदेशी गुंतवणूक येणार नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले. बेंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना टाटा म्हणाले की, नवे सरकार मजबूत संख्याबळावर सत्तेत आल्यानंतर उद्योगांना गती मिळेल, असे वाटत होते. पण भारतीय उद्योगात तसे बदल प्रत्यक्षात दिसत नाहीत. केवळ आश्वासने नको तर भारतात परदेशी गुंतवणूक येण्यास तसे वातावरणही हवे, असेही ते म्हणाले. सीएमआय अर्थात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यासारख्या संस्थांनी गुंतवणुकीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामध्येही आशादायी चित्र नाही. या अहवालानुसार तिसऱ्या तिमाहीत नवीन क्षमता निर्माण करणाऱ्या प्रस्तावात ७४ टक्के घट झाली आहे. आर्थिक जगतातील घसरणीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सीएमआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ महेश व्यास यांनी सांगितले. उत्पादन, निर्मिती या क्षेत्रात घसरण पाहायला मिळत आहे.