अरुण बारसकर, सोलापूरदक्षिण भारतात सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात कांद्याचे दर घसरले असून, याचा परिणाम सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरही झाला आहे. कांदा विक्रीत राज्यात आघाडीवर असलेल्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी व दरही घसरले आहेत.कमी कालावधीत चांगला पैसा मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याकडे शेतकरी वळला असला तरी कांद्याचे वांदे झाले आहे. अवेळी व अपुऱ्या पावसाच्या भरवशावर लागवड केलेल्या कांद्यावर करपा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. फवारणीच्या माध्यमातून औषधांचा मारा केल्याने व सेंद्रीय खत वापरलेल्या ठिकाणचा कांदा बऱ्यापैकी आला आहे, परंतु कांदा विक्रीसाठी म्हणावा तसा दर मिळेना झाला आहे. दोन दिवस दर बऱ्यापैकी वाढला की कांद्याची आवक वाढते व कांद्याची आवक वाढली की दरात घसरण होते. दक्षिण भारतात मागील १५-२० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा मोठा परिणाम कांदा बाजारावर व दरावर झाला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व पावसाळी वातावरणामुळे कांद्याची उचल व्यापारी करीत नाहीत. त्यामुळे दरही वाढत नसल्याचे सांगण्यात आले.मागील वर्षीपेक्षा कांद्याची आवक कमी आहे. शेतकऱ्यांकडे असलेला कांदा दर कमी असल्याने विक्रीसाठी येत नाही. मागील वर्षीपेक्षा यावर्षी कांद्याला सरासरी दर वाढला आहे. दक्षिण भारतात पाऊस थांबल्याने दर वाढण्याची आशा.- दिलीप माने,अध्यक्ष, कृ. उ. बाजार समिती
कांदा दरात घसरण; आवकही घटली
By admin | Updated: December 9, 2015 23:35 IST