Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्ष महागुंतवणुकीचे!

By admin | Updated: January 1, 2016 04:34 IST

अर्थव्यवस्थेतील सुधाराच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील कंपन्यांनी मंदीच्या काळात गुंडाळून ठेवलेली विस्तार योजना पुन्हा हाती घेण्यास सुरुवात केली असून, भांडवल उभारणीस २०१६च्या

- मनोज गडनीस,  मुंबई
अर्थव्यवस्थेतील सुधाराच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील कंपन्यांनी मंदीच्या काळात गुंडाळून ठेवलेली विस्तार योजना पुन्हा हाती घेण्यास सुरुवात केली असून, भांडवल उभारणीस २०१६च्या वर्षात भारतीय शेअर बाजारात तब्बल ५० हजार कोटी रुपयांची समभाग विक्री होणार असल्याचे वृत्त आहे.
२०१४च्या शेवटी मंदीचे सावट संपल्यानंतर २०१५च्या सरत्या वर्षात भारतीय शेअर बाजारात सरकारी आणि खाजगी कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्री(आयपीओ)च्या माध्यमातून सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विक्री केली. २०१५च्या वर्षात दुसऱ्या सहामहीत अर्थव्यवस्थेतील सुधार शेअर बाजारात कंपन्यांच्या सक्रिय वावरातून दिसून आला. त्याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत २३ कंपन्यांनी आयपीओसाठी बाजारात अर्ज केला असून, या माध्यमातून सुमारे ८८०० कोटी रुपयांच्या समभाग विक्रीला हिरवा कंदील मिळाला आहे.
समभाग विक्रीस इच्छुक कंपन्यांमध्ये काही सरकारी कंपन्यांचा समावेश आहे तर खाजगी क्षेत्रात प्रामुख्याने बँका, पायाभूत सेवा कंपन्या, हेल्थकेअर कंपन्यांचा समावेश आहे. एवढे मोठे आयपीओ येऊ घातल्याने याचा भारतीय बाजारपेठेवर निश्चितच परिणाम होईल, असे मत शेअर बाजार विश्लेषक अशोक मेहता यांनी व्यक्त केले.

विवाहाचे मार्केटही जोरात
२०१६मध्ये आयपीओसाठी उत्सुक कंपन्यांमध्ये मॅट्रीमोनी अर्थात लग्न जुळविण्याचे काम करणारी एक अग्रगण्य कंपनीदेखील ४५० कोटी रुपयांची समभाग विक्री करणार आहे. देशाच्या लोकसंख्येत ५४ टक्क्यांपेक्षा जास्त तरुणांची लोकसंख्या असल्याने लग्नाची बाजारपेठ भक्कम असल्यामुळेच मॅट्रिमोनी कंपन्यांनाही विस्तारासाठी भांडवलाची गरज भासत आहे हे विशेष !