संजय पाठक, काठमांडू विनाशकारी भूकंपाच्या झटक्यांनंतर नेपाळ आता महागाईच्या चटक्यांमध्ये होरपळून निघत आहे. मजुरी, घरभाड्याचे वाढलेले दर, वस्तूंच्या भडकलेल्या किमती यामुळे नेपाळी नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.नेपाळमध्ये भारतातील उत्तर प्रदेश व बिहारमधील मजुरांचे चांगलेच प्रस्थ होते. बांधकामासह अन्य कामांसाठी हे मजूर पूर्वी सहज उपलब्ध होत असत. मात्र, एप्रिलमध्ये आलेल्या भूकंपामुळे बहुतांश मजूर भारतात परतले आहेत. त्यामुळे तेथे अर्धवट पडलेल्या वास्तू तोडण्यासाठी तसेच नवीन इमारतींच्या बांधकामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. परिणामी, स्थानिक नेपाळी मजुरांनी आपले दर अवाच्या सव्वा वाढवले आहेत. भूकंपाआधी एक मजूर साधारणत: ४०० ते ५०० रुपये रोज मजुरी घेत असे. आता स्थानिक मजुरांनी तब्बल १,६०० रुपयांपर्यंत दर वाढवून टाकले आहेत. त्यामुळे भूकंपामुळे तुटलेली, पडलेली घरे उतरविण्यासाठी वाजवी दरात मजूर उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. भूकंपामध्ये अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने कित्येक नागरिक बेघर झाले आहेत. त्यांना निवासासाठी घर भाड्याने घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र, घरांचे भाडेही गगनाला भिडले आहेत. साध्या दोन खोल्यांच्या घरासाठी पूर्वी महिन्याला अडीच हजार रुपये भाडे आकारले जात असे. आता हेच भाडे दुपटीने वाढून चार ते साडेचार हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहे. जमिनींच्या किमतीही प्रचंड भडकल्या आहेत. एक लाखाचा प्लॉट आता तीन लाखांवर गेला आहे. एवढी किंमत येत असूनही लोक जमिनी विकण्यास तयार नाहीत. त्या ‘लीज’वर दिल्या जात आहेत.
नेपाळला आधी बसले भूकंपाचे झटके, आता महागाईचे चटके!
By admin | Updated: June 21, 2015 23:42 IST