अमरावती : भारताला विकसनशील राष्ट्र ते विकसित राष्ट्र हा टप्पा पार पाडण्याकरिता संशोधन व विकासासाठी गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्र परिषदेचे माजी अध्यक्ष व आयआयटी मद्रासचे माजी संचालक राममूर्ती नटराजन यांनी केले. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स आॅन पॉवर, आॅटोमेशन अँड कम्युनिकेशन इनपॅक २०१४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते ‘ऊर्जा व दळणवळण क्षेत्रातील संधी व आव्हाने’ या विषयांवर बोलत होते.माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून देशातील गरिबीचे निर्मूलन करणे सहज शक्य आहे. काही राज्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाचे जगणे सुसह्य केले आहे. सौर व पवन ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करून पारंपरिक ऊर्जा स्रोतापासून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे शक्य आहे. सौर ऊर्जा स्रोतापासून तयार होणारी वीज राष्ट्रीय विद्युत वाहिनीला जोडताना येणाऱ्या अडचणी तसेच त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यात संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. आगामी काळात स्वयंचलन हे क्षेत्र अत्यंत वेगाने विकसित होत आहे, असे नटराजन म्हणाले. (प्रतिनिधी)
संशोधन, विकासाकरिता गुंतवणूक वाढविणे गरजेचे
By admin | Updated: October 9, 2014 03:39 IST