मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४२ अंकांनी वाढून २७,७0५.३५ अंकांवर बंद झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल वस्तू आणि सेवा कर सुधारणांना मंजुरी दिल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत काही ब्ल्यूचिप कंपन्यांची कामगिरी उत्तम राहिल्याचा लाभही बाजाराला झाला. गुंतवणूक संस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स २७,८५४.४६ अंकांवर पोहोचला होता. ही दिवसभरातील सर्वोच्च पातळी ठरली होती. सत्राच्या अखेरीस तो १४१.९२ अंकांची अथवा 0.५१ टक्क्यांची वाढ नोंदवून २७,७0५.३५ अंकांवर बंद झाला. आयटीसीचा समभाग ३.९0 टक्क्यांनी वाढून ३१५.८0 रुपयांवर गेला. ३0 जूनला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा शुद्ध नफा ३.६१ टक्क्यांनी वाढून २,२६५.४४ कोटींवर गेला आहे. त्याचा लाभ कंपनीला शेअर बाजारात मिळाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पुन्हा एकदा ८,४00 अंकांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. ४६.७५ अंकांची अथवा 0.५६ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,४२१.८0 अंकांवर बंद झाला. वाढीचा लाभ मिळालेल्या सेन्सेक्समधील कंपन्यांत डॉ. रेड्डीज, सिप्ला, एचयूएल, एचडीएफसी, भेल, एसबीआय, बजाज आॅटो, एम अँड एम, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक आणि ओएनजीसी यांचा समावेश आहे. घसरण सोसावी लागलेल्या कंपन्यांत सन फार्मा, हिंदाल्को, इन्फोसिस, टीसीएस, टाटा स्टील आणि एल अँड टी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
मुंबई शेअर बाजार १४२ अंकांनी वाढला
By admin | Updated: July 31, 2015 02:09 IST