मुंबई : गुंतवणुकीसाठी देशात गुजरात हे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचे राज्य असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी केला असला तरी प्रत्यक्षात २०११ पासून गुजरातेतील गुंतवणुकीला ओहोटी लागल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन’ने (डीआयपीपी) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०११ च्या तुलनेत गेल्या तीन वर्षांत ही गुंतवणूक ३३ टक्क्यांनी घटल्याची नोंद झाली. विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एकूण ५४४ प्रस्ताव आले होते. या अंतर्गत सुमारे १.४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. या तुलनेत, २०१३ मध्ये केवळ ३५४ प्रस्ताव आले असून यापोटी ९५ हजार २५९ कोटी रुपयांचीच गुंतवणूक झाली, तर २०१४ मध्ये आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीतही घट दिसून आली असून २०१३ च्या याच कालावधीच्या तुलनेत ही घट ६४ टक्के इतकी आहे. २०१३ मध्ये या कालावधीपर्यंत गुजरातेत ६१ हजार ८४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती; मात्र यंदा आतापर्यंत अवघी २१ हजार ९७९ कोटी रुपयांचीच गुंतवणूक झाली आहे. केवळ नवीन गुंतवणूकच नव्हे, तर सध्या कार्यरत कंपन्यांनीदेखील विस्तारासाठी फारशी हालचाल केली नसल्याचे दिसले आहे. २००८ ते २०११ या कालावधीमध्ये गुजरातेतील गुंतवणुकीचा आलेख उंचावणारा होता. २००८ मध्ये तेथे ३६३ प्रस्तावांच्या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली, तर २००९ मध्ये ही संख्या वाढून ३७६ एवढी होत या माध्यमातून १.४२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. सर्वाधिक गुंतवणूक ही २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी ४९७ प्रकल्पांच्या माध्यमातून १.४९ लाख कोटी रुपये गुजरातेत आले; परंतु त्यानंतर मात्र तेथील गुंतवणुकीला ओहोटी लागली आहे. (प्र्रतिनिधी)
मोदींच्या गुजरातेत गुंतवणूक घटली!
By admin | Updated: September 22, 2014 22:49 IST