नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शिथिल अर्थव्यवस्था अन् सरकार दिशाहीन असून परिस्थितीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वातील मोदी सरकारवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, सत्तेत आल्यापासून म्हणजेच १९ महिन्यांत सरकारने आपले आश्वासन पाळले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार वाढविण्याचे आणि खासगी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याचे आश्वासन दिले होते. सद्य परिस्थितीत सरकारचा वेग मंदावलेला दिसत आहे. संसदेत मागील आठवड्यात सादर करण्यात आलेल्या मध्यावधी आर्थिक विश्लेषणातून ही बाब स्पष्ट झाली आहे की, सरकार विकासाचा वेग कायम राखण्यात अपयशी ठरले आहे. चिदंबरम म्हणाले की, एकूणच परिस्थितीवरून समस्येवर तोडगा काढण्याची क्षमता नसल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी विकासदर ८.१ टक्क्यांहून घटवून ७.५ टक्क्यांपर्यंत केला आहे.
‘शिथिल अर्थव्यवस्था अन् दिशाहीन सरकार’
By admin | Updated: December 22, 2015 02:39 IST