Join us  

दोन वर्षांत दिला अडीच लाखांना रोजगार, अर्थसंकल्पाद्वारे दिली जेटलींनी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 11:32 PM

गेल्या २ वर्षांत केंद्र सरकारमध्ये जवळपास २.५३ लाख नोक-या निर्माण झाल्या, अशी माहिती अर्थसंकल्पातून समोर आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या २ वर्षांत केंद्र सरकारमध्ये जवळपास २.५३ लाख नोक-या निर्माण झाल्या, अशी माहिती अर्थसंकल्पातून समोर आली आहे. या अर्थसंकल्पानुसार, १ मार्च २०१८ पर्यंत केंद्र सरकारच्या कर्मचा-यांची अंदाजे संख्या ३५.०५ लाख असेल. मार्च २०१६ मधील ३२.५२ लाख संख्येपेक्षा ही संख्या २.५३ लाखांनी अधिक आहे.सन २०१६-१७ च्या दरम्यान केंद्र सरकारच्या विविध विभागांत जवळपास २.२७ लाख नोक-या निर्माण झाल्या. अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजांमधील माहितीनुसार, १ मार्च २०१७ पर्यंत अंदाजे ३४.८ लाख कर्मचारी केंद्र सरकारच्या विविध विभागांत काम करत होते. केंद्र सरकारच्या पोलीस विभागातील कर्मचा-यांची संख्या १ मार्च २०१६ रोजी १०,२४,३७४ होती. मार्च २०१८ पर्यंत विदेश मंत्रालयात अंदाजे १,१९६ कर्मचा-यांची वाढ होईल.अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार, १ मार्चपर्यंत कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण या विभागांतर्गत १,९४४ नोक-या उपलब्ध होतील. २०१६ मध्ये ही संख्या ३,९९६ होती. मार्च २०१६ ते मार्च २०१८ या काळात पशुसंवर्धन, डेअरी आणि मत्स्यपालन या क्षेत्रात १,५१९ नोक-या निर्माण होण्याची शक्यता आहे. या विभागात मार्च २०१६ मध्ये २,३४२ कर्मचारी होते, ते मार्चपर्यंत ३,८६१ होतील. अणुऊर्जा विभागातील कर्मचा-यांच्या संख्येत १ मार्च २०१८ पर्यंत ६,२७९ नोक-या निर्माण होतील. १ मार्च २०१६ पर्यंत या विभागातील कर्मचा-यांची संख्या ३०,६३९ होती. ही संख्या पुढील महिन्यात ३६,९१८ पर्यंत जाईल.नागरी उड्डयन मंत्रालयातील कर्मचा-यांची संख्या १,१४५ आहे. मार्चपर्यंत ही संख्या १,१९७ होईल. त्याचप्रमाणे, सांस्कृतिक मंत्रालयात ३,०२४ कर्मचा-यांची वाढ होईल. १ मार्च २०१६ पर्यंत या खात्यात ७,६७५ कर्मचारी होते. गृहमंत्रालय (पोलीस फोर्स आणि या अंतर्गत येणारे पोलीस खाते वगळून) ५,८३६ जागा भरणार आहे आणि पुढील महिन्यापर्यंत ही संख्या २६,१८८ पर्यंत जाणार आहे. मार्च २०१८ पर्यंत पोलीस खात्यातील कर्मचा-यांची संख्या ११,२५,०९३ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या खात्यात एक लाख कर्मचारी नव्याने घेतले जाण्याची शक्यता आहे.>कर्मचा-यांमध्ये अशी पडणार भरपरराष्ट्र मंत्रालयात मार्च २०१८ पर्यंत १,१९६ कर्मचारी घेण्यात येणार आहेत. २०१६ मध्ये ही संख्या ९,६७२ होती. पर्यावरण मंत्रालय, वने या विभागांतर्गत २,२३४ जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या विभागातील कर्मचा-यांची संख्या ५,११९ वर जाणार आहे. २०१६ मध्ये या विभागात २,८८५ कर्मचारी होते. अल्पसंख्याक मंत्रालयात २०१६ मध्ये ७७४ कर्मचारी होते. पुढील महिन्यात या कर्मचा-यांत आणखी ७७२ कर्मचा-यांची भर पडणार आहे. खाण मंत्रालयात ७७२ कर्मचा-यांची भर पडणार आहे. त्यामुळे ही संख्या ८,५६२ वर पोहोचणार आहे.

टॅग्स :अर्थसंकल्पअर्थसंकल्प २०१८अरूण जेटली