Join us

जपानसारख्या महाशक्तीला मागे टाकणं एकेकाळी स्वप्न होतं.. आनंद महिंद्रांना आठवले जुने दिवस, सांगितलं नवं चॅलेंज 

By जयदीप दाभोळकर | Updated: May 26, 2025 10:09 IST

Anand Mahindra Viral Post: जपानला मागे टाकत भारतानं जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला. उद्योगपती आनंद महिंद्रा आणि हर्ष गोएंका यांनी या यशाचं कौतुक केलंय.

Anand Mahindra Viral Post: जपानला मागे टाकत भारतानं जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा आणि हर्ष गोएंका यांनी या यशाचं कौतुक केलंय. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय. "मी बिझनेस स्कूलमध्ये असताना जीडीपीमध्ये जपानला मागे टाकणं हे दूरचं स्वप्न वाटत होतं. हेच आजचं वास्तव आहे. आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत," असं महिंद्रा म्हणाले.

जपान एक मजबूत अर्थव्यवस्था आहे आणि भारताची प्रगती ही कोट्यवधी भारतीयांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेची साक्ष आहे. या यशावर आपण थांबू नये, असं महिंद्रा म्हणाले. भारतानं दरडोई जीडीपी वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासन, पायाभूत सुविधा, उत्पादन, शिक्षण आणि भांडवलाची उपलब्धता यात सुधारणा होणं गरजेचं आहे. आपण आत्मसंतुष्ट होता कामा नये. भारताला अधिक उंची गाठायची असल्याचंही त्यांनी म्हटलं.

हर्ष गोयंकांनीही केलं कौतुक

आनंद महिंद्रा व्यतिरिक्त, आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनीही या कामगिरीचं कौतुक केलं. "शून्यापासून जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत! भारतानं ४.१८७ ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह जपानला मागे टाकलंय. अब्जावधी स्वप्नं, एक न थांबणारा प्रवास. जय हिंद!" असं गोयंका म्हणाले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भातील पोस्ट शेअर केलीये. गोयंका यांनी जगातील टॉप १० अर्थव्यवस्थांचा फोटोही शेअर केला.

टॉप ४ देश कोणते?

नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शनिवारी सांगितलं की, भारत जपानला मागे टाकून चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ते म्हणाले, "सध्या आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत." आयएमएफच्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी ४.१९ ट्रिलियन डॉलर्स आहे, जो अमेरिका (३०.५१ ट्रिलियन), चीन (१९.२३ ट्रिलियन) आणि जर्मनी (४.७४ ट्रिलियन) यांच्या मागे आहे.

जर भारत आपल्या योजना आणि रणनीतींवर ठाम राहिल्यास पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. सध्याचे भू-राजकीय आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :आनंद महिंद्राअर्थव्यवस्थाजपान