मुंबई : मकरसंक्रांती आणि पोंगलचा सण देशभरात साजरा होत असतानाच आज, गुरुवारी सकाळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेला पाव टक्क्यांच्या रेपो दरातील कपातीचा तीळगूळ दिला. यामुळे गृहकर्ज, वाहनकर्जासह विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात कपात होणार असल्याने ही कर्ज स्वस्त होऊन ग्राहकांच्या खिशात चार पैशांची अधिक बचत होईल.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली लक्षणीय घट, परिणामी आवाक्यात आलेली चालू खात्यातील वित्तीय तूट, गेल्या काही महिन्यांत महागाई दराचाही घसरणारा आलेख यामुळे व्याजदरात कपात करण्यास पूर्णपणे अनुकूल वातावरण झाले होते. वास्तविक, गेल्या महिन्यात सादर झालेल्या पतधोरणातच व्याजदरकपातीची आशा होती. मात्र, राजन चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी दरकपात न करण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने दरकपात टळली होती. (प्रतिनिधी)
व्याजदर कपातीचा तीळगूळ
By admin | Updated: January 16, 2015 06:34 IST