मुंबई : अर्थकारणात सुधार येत असल्याचा दावा केंद्र सरकारकडून होत असला, तरी महागाईचा पारा मात्र वर चढताना दिसत आहे. केंद्रीय सांख्यिकी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५ या वर्षात नोव्हेंबर महिन्यात महागाईचा दर ५.४१ टक्क्यांच्या सर्वोच्चांकावर पोहोचला असल्याचे दिसून आले आहे.कागदावरच्या या आर्थिक जंंजाळात वाढलेल्या महागाईचा वार्षिक पातळीवर सोपा हिशेब सांगायचा झाल्यास, सर्व भाज्या, अन्नधान्यांच्या किमतीमध्ये किमान २० ते कमाल ४० टक्के वाढ नोंदली गेली आहे. केंद्रीय सांख्यिकी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आॅक्टोबर २०१५ या महिन्यातील अन्नधान्यातील महागाईचा दर हा ५.२५ टक्के इतका होता, तर त्या तुलनेत नोव्हेंबर २०१५ मधील अन्नधान्यातील महागाईचा दर हा ६.०७ टक्के होता. याच अनुषंगाने वार्षिक आकडेवारी तपासली असता, नोव्हेंबर २०१५ मध्ये १.१३ टक्के असलेला अन्नधान्याच्या महागाईच्या दरात सरत्या वर्षात घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. अन्नधान्यातील या भाववाढीचा मोठा फटका एकूण महागाईच्या दरात विक्रमी वाढ होण्याच्या रूपाने दिसून आला आहे. अपुऱ्या मान्सूनचा मोठा फटका सर्वच अन्नधान्य आणि भाजीपाल्याला बसला आहे. विशेषत: विविध प्रकारच्या डाळींनी तर दशकातील उच्चांक गाठला. (प्रतिनिधी)
महागाई आणखी भडकली !
By admin | Updated: December 15, 2015 01:39 IST