- मनोज गडनीस, मुंबईसणासुदीचे दिवस तोंडावर असताना महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे मागणी व पुरवठ्याचे गणित विस्कळीत झाल्यामुळे भाजीपाला, धान्य, कडधान्य, फळे अशा सर्वच दैनंदिन गरजेच्या घटकांच्या किमतींमध्ये किमान ४० ते कमाल ६० टक्के वाढ झाली असून, आगामी काळात या किमती आणखी किमान १० टक्क्यांनी भडकण्याचे संकेत मिळत आहेत.राज्यासह देशावर दुष्काळाची छाया पसरली असल्याने याचा मोठा फटका सध्याच्या उत्पादनाच्या पातळीवर असलेल्या घटकांना बसत असून, याची परिणती थेट महागाई भडकण्याच्या रुपाने होत आहे. बाजारात फेरफटका मारल्यास कांदा ६० रुपये, टोमॅटो ४० रुपये, गवार ६० रुपये, भेंडी ४८ रुपये, सिमला मिरची ८० रुपये, तर पालेभाजीदेखील ३५ रुपये ७० रुपयांच्या दरम्यान पोहोचली आहे. कडधान्यांच्या किमती किमान ४० रुपयांच्या घरात आहेत. तर डाळीच्या किमतीनेही शंभरी गाठली आहे़ अशा परिस्थितीत आगामी काळात आणखी किमती भडकण्याचे संकेत मिळत आहेत. केवळ दुष्काळ नव्हे तर अर्थकारणाच्या पातळीवर विचार केला, तर निर्यात रोडावली असून चलनवाढीचे प्रमाण आवाक्यात नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होत असल्या तरी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असल्यामुळे आयात खर्चात वाढ होतानाच वित्तीय तूटवाढीची भीती आहे.
सणासुदीच्या उंबरठ्यावर महागाईची झळ
By admin | Updated: September 8, 2015 05:41 IST