Join us

महागाईचा पारा उतरला

By admin | Updated: July 15, 2014 02:12 IST

खाद्यवस्तू आणि भाजीपाल्याच्या किमती उतरल्याचा परिणाम महागाईच्या दरावर दिसून आला आहे. जूनमधील महागाईचा दर उतरून ५.४३ टक्क्यांवर आला आहे.

नवी दिल्ली : खाद्यवस्तू आणि भाजीपाल्याच्या किमती उतरल्याचा परिणाम महागाईच्या दरावर दिसून आला आहे. जूनमधील महागाईचा दर उतरून ५.४३ टक्क्यांवर आला आहे. मे महिन्यात महागाईचा दर ६.0१ टक्के झाला होता. हा पाच महिन्यांचा उच्चांक ठरला होता. या पार्श्वभूमीवर जूनमध्ये उतरलेला दर महत्त्वाचा ठरतो. गेल्या वर्षी म्हणजेच २0१३ च्या जूनमध्ये महागाईचा दर ५.१६ टक्के होता. महागाईचा दर उतरला असला तरी बटाटे आणि कांद्याचे भाव तेजीतच आहेत. अन्य भाज्यांचे भाव मात्र घसरले आहेत. ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई कमी झाल्यामुळे सरकारला थोडा दिलासा मिळणार आहे. ठोक किंमत निर्देशांकानुसार, भाज्यांच्या वर्गातील महागाईचा दर ५.८९ टक्क्यांनी कमी झाला आहे. या उलट बटाटे आणि कांद्याची महागाई मात्र अनुक्रमे ४२.५१ टक्के आणि १0.७0 टक्क्यांनी वाढली आहे. स्वस्त झालेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये साखर आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. साखरेचे भाव जूनमध्ये ३.0९ टक्के कमी झाले, तर खाद्यतेलाचे भाव 0.७५ टक्क्यांनी कमी झाले. महाग झालेल्या वस्तूंमध्ये फळे, दूध, अंडी, मांस, मासे आणि तांदूळ यांचा समावेश आहे. फळे २१.४0 टक्क्यांनी महागली. दूध १0.८२ टक्के, अंडी, मांस आणि मासे १0.२७ टक्के, तर तांदूळ १0.२४ टक्क्यांनी महाग झाले. ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा एकूण दर उतरला असला तरी, खाद्यवस्तूंच्या वर्गातील महागाईचा दर मात्र वाढलेलाच आहे. तो ८.१४ टक्क्यांवर आहे. ही बाब सरकारसाठी काळजीची ठरणारआहे. अर्थसंकल्पात शेतीसाठी पायाभूत सोयी निर्माण करण्याकरिता ठोस घोषणा केल्या आहेत. त्यामुळे कृषी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. तथापि, यंदा मान्सून लांबल्यामुळे खाद्यवस्तूंच्या किमतीवरील दबाव कायम आहे. पाऊस न पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)