Join us

११२ होणार भारताचा इमर्जन्सी क्रमांक!

By admin | Updated: April 7, 2015 23:22 IST

पोलीस, अग्निशमन दल किंवा अ‍ॅम्ब्युलन्स अशा कोणत्याही प्रसंगी किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत संपूर्ण देशभर ११२ हा क्रमांक वापरता येऊ

नवी दिल्ली : पोलीस, अग्निशमन दल किंवा अ‍ॅम्ब्युलन्स अशा कोणत्याही प्रसंगी किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत संपूर्ण देशभर ११२ हा क्रमांक वापरता येऊ शकेल, असे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मंगळवारी सुचविले आहे.अमेरिकेत ९११ हा क्रमांक कोणत्याही आणीबाणीच्या (इमर्जन्सी) परिस्थितीत वापरता येतो. या धर्तीवर टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने (ट्राय) ही शिफारस केली आहे. भारतात सध्या वापरले जात असलेले १००, १०१, १०२ आणि १०८ या आणीबाणीच्या परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या क्रमांकांचे एकीकरण करून त्याऐवजी ११२ हा एकच क्रमांक वापरावा, असे ट्रायने म्हटले आहे. हा ११२ क्रमांक सरकार संपूर्ण देशभर लोकांमध्ये व्यापकपणे प्रचार करून पोहोचवू शकते व सध्याचे १००, १०१, १०२ आणि १०८ हे क्रमांक दुय्यम म्हणून कायम राखू शकते, असेही सुचविण्यात आले आहे. कोणीही वरील क्रमांक लावला (डायल) की तो नव्या ११२ क्रमांकावर आला पाहिजे. कोणताही मोबाईल किंवा लँडलाईन फोनवरून फोन करता येत नसेल किंवा हे फोन तात्पुरते बंद केलेले असतील तरीही ११२ या क्रमांकावर त्यावरून फोन करता आला पाहिजे, असेही ट्रायने स्पष्ट केले. संकटात सापडलेल्या लोकांचे फोन कॉल्स हाताळण्यासाठी ट्रायने पब्लिक सेफ्टी आन्सरिंग पॉर्इंटस् (पीएसएपी) उभारण्याचीही शिफारस केली आहे. संकटप्रसंगी द्यायच्या मदतीचे समन्वयन करण्यासाठी पीएसएपीअंतर्गत प्रतिसाद व्यवस्थापन पद्धती (रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम) तयार करण्याचीही शिफारस ट्रायने केली आहे.