Join us  

प्रक्रिया उद्योगात भारताला मिळू शकते मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:54 AM

भारताने देशांतर्गत प्रक्रिया उद्योग मजबूत केल्यास हे दर ठरविण्याची संधीही भारताला मिळू शकेल, असे मत व्यक्त होत आहेत.

प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : जगातील सर्वात मोठा एरंडी उत्पादक तर दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश असूनही भारताला या दोन्ही उत्पादनांच्या किमती ठरविता येत नाहीत. या किमती चीनमध्ये ठरत असतात. त्यामुळे भारताने देशांतर्गत प्रक्रिया उद्योग मजबूत केल्यास हे दर ठरविण्याची संधीही भारताला मिळू शकेल, असे मत व्यक्त होत आहेत.भारतातून दरवर्षी ५ हजार कोटींचे एरंडी तेल चीनला निर्यात केले जाते. या व्यवहारासाठी एक्स्चेंज नसल्याने त्याचे दर चीनमध्ये ठरविले जातात. एरंडीचे तेल ४५ डिग्री तापमानात तापविले तर त्याला वेगवेगळे स्वरूप प्राप्त होते. शून्य गुरुत्वाकर्षणातही एरंडीचे वंगण टिकाव धरू शकते. अशा उच्चप्रतीच्या तेलाचे दर चीन ठरवित आहे. भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा कापूस उत्पादक देश असूनसुद्धा कापसाच्या दरासाठी आपण चीनवरच अवलंबून असतो. कारण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापड तयार होते. दरवर्षी भारत चीनला १२ ते १५ लाख गाठी निर्यात करीत असतो. कापड व एरंडी तेल तयार करण्याचे प्रक्रिया उद्योग भारतात मोठ्या प्रमाणात सुरू झाले तर आपण त्यांचे दर ठरवू शकतो. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा लाभ होणार असून व्यापाºयांना नफा कमवण्याची फारशी संधी राहणार नाही.खते व कीटकनाशकांच्या उत्पादनात जी रसायने वापरली जातात त्यापैकी ५० टक्के रसायने आयात केली जातात, मात्र त्यातील सर्वात जास्त आयात ही चीनमधूनच होते. फॉस्फरसची आयातही चीनमधून होते. सूक्ष्म अन्नद्रव्ये उद्योगाला एथिलीन डायअँमिट्रेटा अ‍ॅसेटिक आम्लाची (इडिटीए) आवश्यकता असते. ‘इडिटीए’ उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने भारतात त्याचा एकही प्रकल्प नाही. या रसायनांमधूनही चीन मोठा नफा कमवत आहे. ‘इडिटीए’सह ट्रॅक्टर, वाहनांचे सुटे भाग, शेतीसाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पाण्याच्या मोटारीचे इंजिन, सुटे भाग, कृषी अवजारे, स्प्रे पंप, ड्रिप, प्रक्रिया उद्योग, हार्वेस्टिंग यंत्रे, पॅकेजिंग, टिश्यूकल्चर, ग्रीन हाउससाठी लागणारे कापड आदींची आयात चीनमधून केली जाते.>चीनच्या निर्यातीपेक्षा आयात जास्तसन २०१८ या वर्षात भारतात चीनकडून ७६.८७ अब्ज डॉलरची आयात झाली. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात चीनकडून ६८ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली होती. भारताची निर्यात फक्त १६.३२ अब्ज डॉलर एवढीच होती. चीन जास्त निर्यात करतो व अल्प प्रमाणात भारताकडून आयात करीत असतो. यामुळे चीनसोबतचा व्यापार तोट्यातच जात आहे.>शेतीसाठीची लहान अवजारे, मशिनरींची आयात चीनकडून केली जाते, मात्र आपल्या देशातही अवजारे, मशीन तयार होतात. त्यांचा दर्जाही चांगला आहे. चिनी अवजारे, मशीन स्वस्त असल्याने त्याची आयात जास्त होते; पण ती टिकाऊ नसल्याने शेतकरी आता पुन्हा भारतातील मालाकडे वळू लागले आहेत.- राम भोगले,माजी अध्यक्ष, ‘सीएमआयए’--------------------------आपल्याकडे प्रक्रिया उद्योग कमी आहेत. कापूस, एरंडी तेल, सोयाबीन यावर येथेच प्रक्रिया झाली, तर त्याचा फायदा शेतकºयांना होईल. चीन उत्पादन स्वस्त देत असताना तिथे पर्यावरण कायदे, गुणवत्ता, मानवाधिकार, कामगार हक्क सर्वांची पायमल्ली करून उत्पादन केले जाते.- उदय देवळाणकर,कृषी अर्थशास्त्र अभ्यासक

टॅग्स :मेक इन इंडिया