Join us

आयकर विभागाने केले १.१७ लाख कोटी रिफंड

By admin | Updated: April 5, 2016 00:23 IST

आयकर विभागाने ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात १.१७ लाख कोटी रुपयांचा कर परत (रिफंड) केला असून यापैकी स्वयंगतिक पद्धतीने ३७,८७० कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : आयकर विभागाने ३१ मार्च रोजी संपलेल्या मागील आर्थिक वर्षात १.१७ लाख कोटी रुपयांचा कर परत (रिफंड) केला असून यापैकी स्वयंगतिक पद्धतीने ३७,८७० कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.३१ मार्च रोजी संपलेल्या २०१५-१६ या आर्थिक वर्षात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना सेवा प्रदान करण्याकामी उल्लेखनीय यश मिळविले असून करदाता सेवेच्या दृष्टीने हे वर्ष विक्रमीच ठरले आहे, असे वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बँका खात्यांचा ताळमेळ लावीत असल्याने रिफंड रकमेचा आकडा वाढू शकतो.बेंगळुरूस्थित केंद्रीय प्रक्रिया केंद्राने (सीपीसी) ४.१४ कोटी आयकर रिटर्नची प्रक्रिया पूर्ण केली असून मागच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ३५ टक्के अधिक आहे.केंद्रीय प्रक्रिया केंद्रामार्फत स्वयंगती (आॅटोमॅटिक) पद्धतीने ३७,८७० कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. विशेष म्हणजे ३० दिवसांच्या आता या पद्धतीने रिफंड करण्याचे प्रमाण ६७ टक्के आहे. ज्यांना अद्याप रिफंड मिळाला नाही, अशा करदात्यांनी या केंद्राकडे आयटीआर-पडताळणी आयटीआर फॉर्म-५ सादर केला की नाही, याबाबत खातरजमा करून घ्यावी, असे आवाहनही सीबीडीटीने करदात्यांना केले आहे. आयकर रिटर्न टपालाने पाठविण्याऐवजी करदाते इलेक्ट्रॉनिक प्रणालीमार्फतही रिटर्नबाबत पडताळणी करू शकतात. जेणेकरून ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करता येईल. या सेवेचा आतापर्यंत ७९ लाख करदात्यांना वापर केलेला आहे. ई-फायलिंग सेवेलाही करदात्यांना मोठा प्रतिसाद दिला असून २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४.३४ कोटी आयटीआर या प्रणालीतहत दाखल करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण २६.८३ टक्के अधिक आहे.