नवी दिल्ली : डाळींचे भडकते भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने तुरीची अतिरिक्त ५ हजार टन डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.सूत्रांनी सांगितले की, सचिवांच्या एका समितीच्या बैठकीत काल कांदा आणि डाळींसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत तूरडाळ आयात करण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला. ही आयात सार्वजनिक क्षेत्रातील खनिज आणि धातू व्यापार मंत्रालयाकडून केली जाईल. या मंत्रालयाने आधीच ५ हजार टन तुरीची आणि उडदाच्या डाळीच्या आयातीसाठी निविदा मागविल्या आहेत. ही डाळ ५ सप्टेंबरपर्यंत भारतात येण्याची अपेक्षा आहे. आयात झालेली डाळ राज्यांना स्वस्त दराने उपलब्ध करून दिली जाईल व नंतर राज्य सरकारे त्यांचे किरकोळ वितरण करू शकतील. सध्या तूर आणि इतर डाळींचे भाव १५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.देशांतर्गत बाजारात मागणी आणि पुरवठ्यात मोठेच अंतर पडल्यामुळे डाळींचे भाव प्रचंड वाढले आहेत. डाळींचा पुरवठा कायम राहून भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाय योजले आहेत. काबुली चना वगळता इतर सगळ्या प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे.
आणखी पाच हजार टन तूर डाळ आयात करणार
By admin | Updated: September 3, 2015 21:56 IST