Join us

वनस्पती तेलाची आयात वाढणार

By admin | Updated: March 24, 2016 00:30 IST

तेलबियांचे उत्पादन कमी आणि खाद्यतेलाची मागणी जास्त राहणार असल्याने २०१५-१६ या काळात वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्क्यांनी वाढून १६० लाख टन होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : तेलबियांचे उत्पादन कमी आणि खाद्यतेलाची मागणी जास्त राहणार असल्याने २०१५-१६ या काळात वनस्पती तेलाची आयात ९.५१ टक्क्यांनी वाढून १६० लाख टन होण्याची शक्यता आहे.२०१५-१६ या पीक वर्षात कपाशी बियाणे (सरकी) आणि खोबरे यासह खरीप आणि रबी हंगामात होणारे तेलबियाणे उत्पादन ३१८.१६ लाख टन होण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये ते ३३६.७९ लाख टन होते. सॉल्व्हेंट अ‍ॅक्स ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) या औद्योगिक संघटनेने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, २०१५-१६ (नोव्हेंबर ते आॅक्टोबर) या काळात वनस्पती तेलाची एकूण आयात (खाद्य आणि गैरखाद्य) १६० लाख टन राहण्याची शक्यता आहे. २०१४-१५ मध्ये ही आयात १४६.१ लाख टन होती.या निवेदनात पुढे म्हटले आहे की, समान व्यावसायिक संधीसाठी सरकारने कच्चे आणि रिफाईन्ड तेलातील आयात शुल्काचे अंतर ७.५ टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के केले पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल. सध्या रिफायनरीची जेवढी क्षमता आहे, त्याच्या ४० ते ५० टक्के क्षमतेचाच वापर केला जातो. आयात शुल्क वाढविल्यास या कारखान्यांची क्षमताही वाढेल.