Join us

आयडीबीआय बँकेला ९ हजार कोटींचे बेलआउट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 03:29 IST

सरकारचा वाटा; एलआयसीची होती मागणी

नवी दिल्ली : नवी दिल्ली : सरकारने आपला वाटा उचलण्याचे मान्य केल्यानंतर आर्थिक संकटातील आयडीबीआय बँकेला ९ हजार कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयडीबीआय बँकेत एलआयसी बहुतांश हिस्सेदार आहे. संकटातील बँकेला पॅकेज देण्याची मागणी एलआयसीने सरकारकडे केली होती. त्यानुसार, सरकारनेही पॅकेजमधील आपला हिस्सा देण्याची तयारी केली आहे. एलआयसीकडून ४,५०० कोटी रुपये पॅकेजसाठी दिले जाणार आहेत. तेवढीच रक्कम सरकार देणार आहे.

भांडवलीकरण योजनेतील ५५ हजार कोटींची तरतूद याआधीच करण्यात आली आहे. १० बँकांच्या विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या बँकांना यातील १६ हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे प्राथमिक अंदाजात म्हटले आहे. ताज्या आर्थिक पाठबळामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास आयडीबीआयला मोठी मदत होणार आहे. बँकेच्या अनुत्पादक भांडवलात (एनपीए) मोठी वाढ झाली आहे. ३० जूनच्या आकडेवारीनुसार बँकेचा एनपीए २९ टक्क्यांवर गेला आहे. बँक मागील ११ महिन्यांपासून एनपीएच्या धोकादायक श्रेणीत होती. बँकेचा भांडवली आधारही घसरला आहे. भांडवली पर्याप्तता प्रमाण (कॅपिटल अ‍ॅडिक्युएसी रेशो) ८.१ टक्के झाला आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँक