मुंबई : आयात शुल्कात वाढ आणि सरकारद्वारा नियंत्रण घातल्याने भारतात जानेवारी-मार्चदरम्यान सोन्याची मागणी २६ टक्क्यांनी घटली. यादरम्यान भारतात एकूण १९०.३ टन सोन्याची मागणी झाली, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) दिली. डब्ल्यूजीसीच्या अहवालानुसार २०१३च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी २५७.५ टन इतकी होती. किमतीच्या तुलनेत २०१४च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी ३३ टक्क्यांनी घटून ४८,८५८ कोटी रुपये झाली. २०१३च्या पहिल्या तिमाहीत एकूण ७३,१८३.६ कोटी रुपयांच्या सोन्याची मागणी झाली होती. डब्ल्यूजीसीच्या भारतीय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पीआर म्हणाले की, २०१४च्या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी २६ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कॅड कमी करण्यासाठी सरकारने सोन्यावर लावलेले नियंत्रण योग्य असल्याचे सिद्ध होते; परंतु देशात अनधिकृत मार्गाने सोन्याची आवक होत आहे. तरीसुद्धा सोन्याच्या तस्करीचे आकलन वेगळे आहे. ते म्हणाले की, संयुक्त अरब अमिरातमध्ये सोन्याची मागणी १३ टक्क्यांनी वाढली. यावरून तेथे भारतीय ग्राहक सोने खरेदी करून देशांतर्गत बाजारात आणत आहेत, हे स्पष्ट आहे. या काळात दागिन्यांची मागणी ९ टक्क्यांनी कमी होऊन १४५.६ टन झाली. २०१३च्या पहिल्या तिमाहीत दागिन्यांची मागणी १५९.५ टन एवढी होती. किमतीच्या तुलनेत दागिन्यांच्या मागणीत १८ टक्क्यांची घट होऊन ३७,३७७.८ कोटी रुपयांवर आली. २०१३च्या पहिल्या तिमाहीत एकूण ४५,३३१.२ कोटी रुपये दागिन्यांची मागणी झाली. (प्रतिनिधी)
भारतात सोन्याची मागणी घटली
By admin | Updated: May 21, 2014 02:23 IST