ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - ज्याक्षणी रिलायन्स जिओ लाँच झाल्याचं मुकेश अंबानींनी जाहीर केलं, शेअर बाजारामध्ये त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. रिलायन्स जिओच्या स्पर्धक कंपन्या असलेल्या आयडिया व भारती एअरटेलचे शेअर अवघ्या अर्ध्या तासात 5 ते 8 टक्क्यांनी घसरले. या कंपन्यांच्या भागभांडवलाच्या भाषेत सांगायचं तर दोन्ही कंपन्यांचं भागभांडवल तब्बल 13,800 कोटी रुपयांनी घसरलं.
प्रति एक जीबी डेटासाठी अवघे 50 रुपये, मोफत व्हॉइस सेवा, रोमिंग सेवा मोफत अशा अनेक आकर्षक सेवा अंबानींनी जाहीर केल्या. केवळ डेटाचा विचार केला तर सध्या अन्य कंपन्या एऐका जीबी डेटासाठी सुमारे 250 रुपये आकारतात.
रिलायन्स जिओ दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवणार हे जवळपास निश्चित असून स्पर्धक कंपन्यांनाही आपापले दर कमी करावे लागणार आहेत, परिणामी त्यांच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. याच कारणासाठी आयडिया सेल्युलर, भारती एअरटेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्सची आज जोरदार विक्री झाली आणि गुंतवणूकदारांचे जवळपास 13 ते 14 हजार कोटी रुपये बुडाल्यात जमा झाले.