Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती झाली नाहीतर आंदोलन

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST

* स्वाभिमानचा इशारा

* स्वाभिमानचा इशारा
कुडूस-भिवंडी-वाडा महामार्गासह तालुक्यातील सर्वच रस्ते खड्ड्यांत गेल्याने स्वाभिमान संघटनेने पोलीस निरीक्षक व ठेकेदारांची बैठक घेऊन २६ ऑगस्टपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा २७ ऑगस्ट २०१४ पासून वाघोटे व अनगाव-कवाड टोलनाक्यावर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
भिवंडी-वाडा महामार्गाची महादशा झाली असून कंचाडफाटा, महालक्ष्मी पेट्रोलपंप, खुपरी, किनईपाडा, वैतरणा नदी, मुसारणे, डाकिवलीफाटा येथील महामार्ग खड्ड्यांत असून नेहमीच छोटे-मोठे अपघात होत आहेत. टोल रस्ता असा फलक रस्त्यावर लावून खड्ड्यांतून जाण्याचा टोल घेतला जातो. याबाबत, वाहनचालकांत संताप आहे. याचबरोबर पिंजाळ नदीवरील पुलाचे काम वर्ष झाले तरी अपूर्णच आहे. एकेरी रस्ता दुहेरी करण्याचे काम अपूर्ण आहे. वळणावर संरक्षक कठडे नाहीत. दुभाजकाचे काम अपूर्ण आहे.
तालुक्यातील कोठले-कुडूस-उचाट रस्ता, कुडूस-चिंचघर रस्ता, कुडूस-खानिवली रस्ता, आबिटघर-कोबारे रस्ता, कोेंढले-खैरे रस्ता, चिंचघर डोंगस्ते-विजयगड रस्ता यांची चाळण झाली असून गणेशमूर्ती नेताना भक्तांना कसरत करावी लागणार आहे. शांतता कमिटीच्या सभेतून या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन बांधकाम अभियंत्यांनी दिले. मात्र, गणेशोत्सव दारात येऊनही कोणताही रस्ता दुरुस्तीला मुहूर्त झाला नसल्याने नागरिकांत असंतोष आहे. याची दखल घेऊन स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेश पाटील, उपाध्यक्ष रवींद्र मेण यांच्यासह कार्यकर्ते २७ ऑगस्ट २०१४ पासून टोलनाक्यावर उपोषणास बसून टोलबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी पालघर, पोलीस अधीक्षक पालघर, पोलीस निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम खाते, वाडा यांना दिले आहेत.

वार्ताहर, अशोक पाटील
=========

वाचली -नारायण जाधव