Join us

गणेशोत्सवाची बातमी

By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST

७० लाखांच्या गणेशमूर्ती

७० लाखांच्या गणेशमूर्ती
वैभव : चार गणेश मंडळांच्या पाच चांदीच्या मूर्ती
श्रद्धेला मोल नसते
औरंगाबाद : शहरातील चार सार्वजनिक गणेश मंडळांनी चांदीच्या पाच गणेशमूर्तीर्ंची स्थापना केली. त्यांचे एकत्रित वजन १५६ किलो ८०१ ग्रॅम एवढे आहे. चांदीची सध्याची किंमत लक्षात घेता या मूर्तीची एकूण किंमत ७० लाखांपर्यंत आहे. भक्तांच्या श्रद्धेला मोल नसते, याची प्रचीती गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत आहे. महानगरातील गणेशोत्सवाने चंदेरी झूल पांघरली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
औरंगाबादेतील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये चांदीच्या गणरायाची प्रतिष्ठापना करून त्यावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साज चढविण्याची अहमहमिका लागली आहे. श्रद्धेला मोल नसते, याचा प्रत्यय गणेशोत्सवावर कटाक्ष टाकला तरी येतो.
अष्टविनायक गणेश मंडळ
शहरात सर्वप्रथम चांदीच्या विघ्नहर्त्याची स्थापना १९७९ मध्ये गुलमंडीस्थित अष्टविनायक गणेश मंडळाने केली. या मूर्तीचे वजन १० किलो ११ ग्रॅम एवढे होते. याच मंडळाने नंतर १९९८ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेली ६७ किलो ५०० ग्रॅम चांदीच्या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी या मूर्तीची स्थापना केली जाते, अशी माहिती दयाराम बसैये यांनी दिली. या मंडळाकडे चांदीच्या दोन मूर्ती आहेत.
राजकमल गणेश मंडळ
१९९५ मध्ये छावणीतील राजकमल गणेश मंडळाने १ किलो ७०० ग्रॅम वजनाची ७ इंच उंचीची पण देखणी चांदीची गणेशमूर्ती स्थापन केली. पुढील वर्षी तब्बल १३ किलो २०० ग्रॅम वजनाची अडीच फुटी गणेशमूर्ती बसविली. तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सवात याच चांदीच्या मूर्तीची विधीवत स्थापना करण्यात येते.
हनुमान गणेश मंडळ
१९६५ मध्ये स्थापन झालेल्या नासगल्लीतील हनुमान गणेश मंडळाची परंपरा उभ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची; पण तब्बल ३७ वर्षांनी ही परंपरा मोडीत काढत २००२ मध्ये ४१ किलो १०१ ग्रॅम चांदीच्या चार फूट उंच मूर्तीची स्थापना केली.
जागृत हनुमान गणेश मंडळ
पानदरिबा परिसरातील जागृत हनुमान गणेश मंडळाने पावणेतीन फुटांच्या २५ किलो वजनाच्या गणेशाची स्थापना केली. दरवर्षी याच मूर्तीची गणेशोत्सवात स्थापना केली जाते.
(जोड)