संतोष वानखडे, वाशिमनैसर्गिक आपत्तीपासून फळपिकांचे संरक्षण म्हणून शासनाने हवामान आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना आणली खरी; मात्र या योजनेत केवळ संत्र्यांचा समावेश करून अन्य फळपीक उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शासनाने राज्यातील निवडक फळपिकांकरिता २०१५-१६ मध्ये हवामान आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना प्रायोगिक तत्त्वावर लागू केली आहे. कमी पाऊस व पावसाचा खंड यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून फळपिकांचे संरक्षण व्हावे व फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे, हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही योजना केवळ संत्रा मृग बहार या फळपिकास लागू आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य फळपिकांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. राज्यात १८.३६ लाख हेक्टर क्षेत्र विविध फळपिकांखाली आहे. त्यामध्ये आंबा ५.२५ लाख हेक्टर, संत्रा १.६८ लाख हेक्टर, मोसंबी १.४५ लाख हेक्टर, डाळिंब १.७३ लाख हेक्टर, केळी ८३ हजार हेक्टर, द्राक्षे ९० हजार हेक्टर या प्रमुख फळपिकांचा समावेश आहे. विदर्भात संत्र्याबरोबरच डाळिंब, आंबा, केळी व काही प्रमाणात चिकू फळपीक घेतले जाते. नेमके संत्रा या पिकालाच विम्याचे संरक्षण कवच लाभत आहे. संत्रा पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रुपये असून त्याचा विमा हप्ता ७ हजार २०० रुपये आहे.
फळपीक विमा योजनेत केवळ ‘संत्रा’च!
By admin | Updated: June 27, 2015 00:04 IST