Join us

चार दिवसांच्या तेजीला लगाम

By admin | Updated: August 4, 2015 23:17 IST

गेल्या चार दिवसांपासून दरवळणारी तेजी रिझर्व्ह बँकेच्या ‘जैसे थे’ धोरणामुळे गायब झाली. चढ-उताराचे हेलकावे घेत भारतीय शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून दरवळणारी तेजी रिझर्व्ह बँकेच्या ‘जैसे थे’ धोरणामुळे गायब झाली. चढ-उताराचे हेलकावे घेत भारतीय शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली. निवडक बँकिंग क्षेत्रातील शेअर्सची खरेदी आणि रुपयाच्या मजबुतीने काही आधार जरूर मिळाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (बीएसई) दिवसअखेर ११५.१३ अंकांनी घसरत २८,०७१.९३ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २६.१५ अंकांनी खाली येत ८,५१६.९० वर स्थिरावला.पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रमुख दरात कोणतेही बदल केला नाही. तथापि, २०१५-१६ मध्ये आर्थिक वृद्धीचा दर ७.६ टक्के राहील, असे भाकीत मात्र रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे. शेअर बाजाराच्या अपेक्षेनुरूप रिझर्व्ह बँकेने स्थिती कायम राखली, असे बीएनपी परिवार फायनान्शियलचे संशोधन विभाग प्रमुख अ‍ॅलेक्स मॅथ्यूज यांनी सांगितले. मंगळवारच्या सत्रात एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स वधारले, तथापि, एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.५७ टक्क्यांनी घसरले. शेअर बाजारात चढ-उतार होत असताना दुसरीकडे रुपया मात्र डॉलरच्या तुलनेत भक्कम झाला.