नवी दिल्ली : कंपन्यांनी पुन्हा एकदा प्रारंभिक सार्वजनिक निर्गमाच्या (आयपीओ) माध्यमातून निधी उभारण्याची योजना आखणे सुरू केले आहे. या कंपन्या याबाबत सेबीशी संपर्क करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीओ बाजारात सुधारणांचे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने बाजाराला बळकटी आली. मर्चंट बँकर्सनी सांगितले की, किमान एक डझन कंपन्या आयपीओसाठी आपले दस्तावेज सेबीकडे दाखल करू शकतात. यामुळे प्राथमिक बाजारात तेजी बघायला मिळू शकते. ही तेजी मागील तीन वर्षांपासून थंडावली आहे. बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधक प्रमुख अॅलेक्स मॅथ्यू म्हणाले की, सेन्सेक्स आणि निफ्टी दररोज नव्या उच्चांकावर झेप घेत आहेत. संस्थागत गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. आयपीओ बाजारात उतरू इच्छित कंपन्यांसाठी ही अत्यंत योग्य वेळ आहे, असेही मॅयू म्हणाले. प्राईम डेटाबेसच्या अहवालानुसार १४ कंपन्यांना सेबीची मंजुरी मिळालेली आहे. बाजारातून २,७९६ कोटी रुपये निधी उभारण्याची या कंपन्यांची योजना आहे. याव्यतिरिक्त चार कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २,७०० कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भांडवल बाजारावर कंपन्यांचे लक्ष
By admin | Updated: May 19, 2014 23:09 IST