जयपूर : इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी जयपूर साहित्य संमेलनात सांगितले की, खाजगी क्षेत्राला सरकारच्या हस्तक्षेपाविना काम करू दिल्यास देश आणखी वेगाने प्रगती करील.नारायण मूर्ती म्हणाले की, कोणत्याही सरकारला एक नियमन करणारी व्यवस्था उभी करायची असते. तथापि, व्यवसाय करणे हे काम पूर्णत: खाजगी क्षेत्राच्या हाती सोपवणे श्रेयस्कर आहे. नियम असे बनवायला हवेत की, ९0 टक्के लोक सरकारच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय मोठ्या आरामात व्यवसाय करू शकतील. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गरजच भासायला नको. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सरकारला अत्यंत श्रेष्ठ दर्जाची नियामकीय व्यवस्था उभी करावी लागेल. नारायण मूर्ती म्हणाले की, आम्ही इन्फोसिसची स्थापना केली तेव्हा आम्हाला जाणवले की, देशात पुरेशा प्रमाणात उद्योग आणि काम आहे. तरीही आयआयटीसारख्या नामवंत संस्थांमधून बाहेर पडलेल्या अनेक इंजिनिअर्सना नोकऱ्या मिळत नाहीत. त्याचवेळी मी विचार केला की, आम्ही अशी कंपनी स्थापन करू, जी पूर्णत: नि:पक्ष, पारदर्शी आणि जबाबदारीने काम करील. कंपनी चालविण्याच्या बाबतीत जगात सर्वोच्च स्थानी जाऊ, असा निर्धार आम्ही केला. मूर्ती म्हणाले की, संकल्पना आणि त्याची अंमलबजावणी याबाबतीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना फार काही करता येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यावर माझा विश्वास होता. उदा. कंपनीचा सीईओ म्हणून मी जे काही निर्णय घेत असे, तेव्हा सर्व लहान-मोठ्यांना या प्रक्रियेत समावून घेत असे. मी सल्लामसलत करीत असलेल्यांमधील बहुतांश जण ३० वर्षांच्या आतील होते.
व्यवसायातील सरकारी हस्तक्षेप संपवा
By admin | Updated: January 26, 2015 03:53 IST