जिनेव्हा : भारतातील थेट परकीय गुंतवणूक २०१५ मध्ये जवळपास दुप्पट होऊन ५९ अब्ज डॉलर झाली असून यामध्ये अमेरिकेचा मोठा वाटा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार व विकास परिषदेने गुरुवारी ही माहिती दिली.भारतातील परकीय गुंतवणूक गेल्यावर्षी अनपेक्षितरीत्या ३६ टक्के वाढली असल्याचे परिषदेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. परिषदेच्या गुंतवणूक व उपक्रम विभागाचे संचालक जेम्स झॅन यांनी सांगितले की, जागतिक गुंतवणुकीचा ओघ १.७ ट्रिलियन इतका झाला असूत तो आर्थिक मंदीपूर्वीच्या गुंतवणुकीच्या जवळ जाणारा आहे. आर्थिक मंदी सुरू झाल्यापासूनची ही सर्वात जास्त गुंतवणूक आहे. २०१५ मध्ये झालेली जागतिक गुंतवणूक व २०१६ साठीचा अंदाज यावर आधारित असलेला हा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी झॅन म्हणाले की, यातील वाईट भाग असा आहे की, जागतिक गुंतवणुकीचा ओघ उत्पादन क्षेत्रातील नाही. प्रामुख्याने कॉर्पोरेट क्षेत्रातील रचना बदलण्यासाठी यातील बराच भाग गुंतविला गेला. २०१५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारात अमेरिकेचा पहिला क्रमांक होता. त्याखालोखाल हाँगकाँग, चीन, नेदरलँड, इंग्लंड, सिंगापूर आदींचा क्रम लागतो. (वृत्तसंस्था)
भारतातील एफडीआय २०१५ मध्ये झाला दुप्पट
By admin | Updated: January 22, 2016 03:07 IST