नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीत मे महिन्यात घसरण होऊन ती २२.३४ अब्ज डॉलरची झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही घसरण २०.१९ टक्क्यांची आहे. निर्यात कमी होण्याचा हा सलग सहावा महिना आहे. दरम्यान, भारताची व्यापारी तूट कमी होऊन तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच १०.४ अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यात कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक पातळीवरील मंदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम झाला. मे २०१४ मध्ये २७.९९ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात झाली होती. त्याआधी नोव्हेंबर २०१४ मध्ये झालेल्या निर्यातीमध्ये ७.२७ टक्क्यांची वाढ झाली होती त्यानंतर मात्र घसरण कायम राहिली आहे. पेट्रोलियम उत्पादने, दागिने, अलंकार व रत्ने, अभियांत्रिकी व रसायनांसह मुख्य निर्यातीचे क्षेत्र कमी झाले आहे. सततच्या घसरणीमुळे निर्यातदारांनीही चिंता व्यक्त केली आहे व सरकारने ही घसरण रोखण्यासाठी तातडीने काही उपाययोजना केल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. फेब्रुवारी २०१४ पासून आतापर्यंत सगळ्यात वेगवान घसरण झाली तर आयातीमध्ये १७.०९ टक्क्यांची घट झाली. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार व्यापार तोटा कमी होऊन तीन महिन्यांतील किमान पातळीवर म्हणजे १०.४ अब्ज डॉलरवर आला.
निर्यातीत झाली घट
By admin | Updated: June 17, 2015 03:28 IST