- मनोज गडनीस, मुंबईगेल्या पाच वर्षांपासून मंदीच्या ग्रहणाने ग्रस्त बांधकाम उद्योगाने, अखेर सुटकेचा निश्वास टाकला असून, चालू आर्थिक वर्षात प्रथमच गतवर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी गृहखरेदीत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे, प्रथम व द्वितीय श्रेणीतील शहरांसोबत मंदीचा सर्वाधिक विपरित फटका बसलेल्या मुंबईसारख्या मेट्रो शहरांतील बांधकाम उद्योगातून हे तेजीचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईबाबत आकडेवारीत सांगायचे, तर गेल्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत मुंबईत १३,२९० घरांची विक्री झाली होती. त्या तुलनेत यामध्ये २८ टक्के वाढ होत, यंदाच्या तिमाहीत १६,९९० घरांची विक्री झाली आहे. शहराच्या आकारमानाच्या तुलनेत हा आकडा फारसा मोठा वाटत नसला, तरी बांधकाम उद्योग आणि एकूणच बाजाराचे मनोबल वाढविणारा ठरला आहे.मुंबईसोबतच पुणे, नागपूर, नाशिक या शहरांतूनही या कालावधीमध्ये घरांच्या विक्रीमध्ये सरासरी २० टक्के वाढ नोंदली गेली आहे. व्याजदर कपातीच्या शक्यता आणि पुढील वर्षी लागू होणारा सातवा वेतन आयोग यामुळे येत्या काळात ही वाढ अशीच राहील अशी आशा बांधकाम विश्लेषक व्यक्त करत आहेत.बिल्डरांचा वन बी एचकेवर भरबाजारातील या सकारात्मक परिस्थितीचे विश्लेषण करताना, बांधकाम व्यावसायिक अमित कुलकर्णी म्हणाले की, गेली काही वर्षं बांधकाम उद्योगासाठी परीक्षेचाच काळ होता. या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे, परंतु विक्रीत होणाऱ्या वाढीचे फ्लॅटच्या आकारमानाच्या अनुषंगाने विश्लेषण होणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने टू बीएचके, थ्री बीचके किंवा त्यावरील घरांच्या निर्मितीकडे बिल्डरांचा कल होता. मात्र, मंदीमध्ये ग्राहकांनी आखडता हात घेतल्याने, मोठ्या प्रकल्पांना फटका बसला. यामुळे पुन्हा बिल्डरलॉबीने वन रूम किचन अथवा वन बीएचके घरांच्या निर्मितीला सुरुवात केली. त्यामुळे आता जी विक्रीत वाढ झाल्याची आकडेवारी आली आहे, त्यातील बहुतांश घरे ही वन बी एचके प्रकारातील आहेत.दरकपातीचे सकारात्मक परिणामअर्थतज्ज्ञ अजय चारी यांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत, सव्वा टक्क्यांनी व्याजदरात कपात केली आहे. गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी कपात आहे, तसेच ही दर कपात दसरा आणि दिवाळीच्या तोंडवर झाल्याने बँका आणि बांधकाम उद्योग या दोन्ही घटकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजना बाजारात आणल्या, त्याचाही हातभार घरांच्या विक्रीचे आकडे वाढण्यात झाला आहे.कर्ज आणखी स्वस्त झाल्यास....मंगळवारी पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांना व्याजदर कपात करण्यास आणखी मुभा असल्याचे म्हटले होते. राजन यांच्या म्हणण्यानुसार बँकांनी कर्जे आणखी स्वस्त केली तर त्याचा परिणामही बांधकाम व्यवसायावर दिसून येईल आणि येत्या काळातही अशीच वाढ होत राहील, अशी आशा आहे.
बांधकाम उद्योगावरील मंदीचे ग्रहण सुटतेय...
By admin | Updated: December 3, 2015 03:53 IST