नवी दिल्ली : डाळींच्या आयातीसाठी सरकारी पातळीवर अजूनही निविदा प्रसिद्ध होत नसल्यामुळे शहरांमध्ये डाळीचे किरकोळ भाव प्रचंड वाढून किलोला १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. चारही महानगरांमध्ये हरभरा आणि मसूर डाळीशिवाय तूर, उडीद व मूग डाळ १०० रुपये किलोच्या पुढे गेली आहे.मुंबई व चेन्नईमध्ये तूर, उडीद व मूग डाळ जास्त पैसे मोजून घ्यावी लागत आहे. त्यानंतर दिल्ली आणि कोलकाताचा नंबर लागतो. अनुकूल नसलेल्या हवामानामुळे पीक वर्ष (जुलै ते जून) २०१४-२०१५ मध्ये देशातील डाळींचे उत्पादन जवळपास २० लाख टनांनी खाली आहे. पर्यायाने गेल्या वर्षभरात डाळीच्या किमतीत ६० टक्क्यांची वाढ झाली.ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई व चेन्नईत तूर डाळीची किंमत आज ११६ रुपये किलो झाली आहे. गेल्यावर्षी ती जूनमध्येच ७२.७९ रुपये होती. उडीद डाळीची किंमत १२१-१२३ रुपये किलो झाली आहे. हीच डाळ गेल्यावर्षी याच महिन्यात ७९.८४ रुपये भावाने मिळायची. वरील दोन्ही शहरांत मूग डाळीची किंमत वाढून १११ रुपये किलो झाली आहे. ती आधी ९२ ते ९७ रुपये होती. हरभरा डाळीचा भाव वाढून ६८ ते ७० रुपये झाला तो ४७ ते ६१ रुपये होता.दिल्ली आणि कोलकात्यात तूर डाळीचा भाव १०५ ते ११३ रुपये किलो होता. गेलावर्षी हीच डाळ ६८ ते ७३ रुपये किलो होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
डाळी १०० रुपये किलो
By admin | Updated: June 21, 2015 23:49 IST