नवी दिल्ली : येत्या सात-आठ वर्षांत संरक्षण क्षेत्रात २५० अब्ज डॉलरची उलाढाल होणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला या क्षेत्रात उत्पादनाची संधी शोधायला हवी.औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाचे (डीआयपीपी) सचिव अमिताभ कांत असोचेमच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही किती वेगाने संरक्षण क्षेत्रात उत्पादन करू शकतो हे बघायला हवे, कारण ही मोठी संधी असून तिचा लाभ भारतीयांना मिळायला हवा. भविष्यात ही संधी वाढणारी आहे. अमिताभ कांत म्हणाले, ‘‘भारत जर येत्या सात वर्षांत १४० अब्ज डॉलरची आयात करणार असेल व देशाच्या सुरक्षेसाठी ११० अब्ज डॉलरच्या उलाढालीची गरज असेल, तर येत्या सात-आठ वर्षांत या क्षेत्रातील उलाढाल २५० अब्ज डॉलरची होईल. आम्ही किती वेगाने संरक्षण साहित्याची निर्मिती करणारा देश बनतो हे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे’’. सरकारने संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्के केली आहे.अमिताभ कांत म्हणाले, ‘‘आम्ही संरक्षण, विमा व आरोग्य विभाग खासगी क्षेत्रासाठी खुले केले आहेत, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थाच खुली करण्यासारखे आहे. मल्टी बँ्रडची किरकोळ बाजारपेठ वगळता आज भारत जगातील सर्वात जास्त खुली बाजारपेठ बनला आहे.’’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
संरक्षण क्षेत्रात ८ वर्षांत होणार २५० अब्ज डॉलरची उलाढाल
By admin | Updated: March 31, 2015 01:12 IST