नवी दिल्ली : साठा करण्यावर आणलेले निर्बंध व जप्त केलेली डाळ खुल्या बाजारात आणणे असे उपाय सरकारने केल्यामुळे गेल्या आठवड्यात तूरडाळीचे भाव कमी झाले. शिवाय डाळींची लागवड वाढल्याचे आलेले वृत्त व कमी झालेली मागणी यामुळेही डाळींचे भाव प्रभावित झाले. सरकारने केलेले विविध उपाय व साठेखोरांकडून जप्त केलेली तूरडाळ खुल्या बाजारात आणल्यामुळे भाव कमी होण्यास मदत झाली. आगामी वर्षातही डाळीचे भाव चढेच राहण्याची शक्यता विचारात घेऊन खाद्यान्न मंत्री रामविलास पासवान यांनी एमएमटीसी व एसटीसी यांना डाळ आयात करण्याची सूचना केली आहे. त्यामुळेही भाव आटोक्यात राहण्यास मदत झाली. राजधानीत गेल्या आठवड्यात तूरडाळ ८ हजार ७०० ते १२ हजार ५०० ते १४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल होता. याआधीच्या आठवड्यात हाच भाव ९ हजार ते १२ हजार ८०० ते १४ हजार ८०० रुपये होता. मूग डाळीचा भाव (तुकडा) प्रतिक्विंटल ६ हजार ९५० ते ७ हजार ५५० ते ७ हजार ९५० रुपये होता. चांगल्या प्रतीची मूगडाळ ७ हजार ९०० ते ८ हजार ६०० रुपये होती. साखरेच्या किरकोळ व ठोक विक्रेत्यांची वाढती मागणी व कमी पुरवठा यामुळे या आठवड्यात साखरेचे भाव वाढले. एम ३० व एस ३० साखरेचे भाव या आठवड्यात अनुक्रमे प्रतिक्विंटल ३२०० ते ३४०० व ३१९० ते ३३९० होते. गेल्या आठवड्यात हे भाव ३०६० ते ३२०० व ३०५० ते ३१९० होते. गुळ स्थिरफारसा उठाव नसल्यामुळे व पुरेसा साठा असल्यामुळे गुळाचे भाव गेला आठवडाभर स्थिर होते. पण मुजफ्फरनगर व मुरादाबाद गूळ बाजारात मात्र भाव घसरले.
डाळी, बासमती उतरला; साखर महागली
By admin | Updated: January 4, 2016 02:31 IST