मुंबई : अनेक वर्षांपासून बँकांकडील थकबाकी ही डोकेदुखी ठरत असतानाच रिझर्व्ह बँकेकडून नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार याबाबतची चिंता आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात असलेले एकूण थकबाकीचे प्रमाण वर्षभरात सुमारे अर्ध्या टक्क्याने वाढले आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्यात बँकांकडील एकूण थकबाकीचे प्रमाण ४.१ टक्के इतके होते. या वर्षी १५ मार्च रोजी हे प्रमाण वाढून ४.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे गेल्या ६ महिन्यांत यात कोणतीही वाढ झालेली नाही. थकबाकीचे आकडे आता स्थिर राहत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी भाषणात थकबाकीची अगदी अलीकडची आकडेवारी जाहीर केली होती. त्या भाषणाची प्रत बँकेने नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात ही बाब अधिकृतपणे स्पष्ट होत आहे. या थकबाकीचे प्रमाण सर्व बँकांमध्ये समप्रमाणात नाही. सरकारी बँकांकडील थकबाकी अधिक आहे, असेही मुंद्रा यांनी सांगितले.सरकारी बँकांकडील थकबाकी या वर्षी मार्चपर्यंत ५.१७ टक्के होती. रिझर्व्ह बँकेने गेले वर्षभर वाढती थकबाकी नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. (प्रतिनिधी)
बँकांकडील थकीत कर्जाचे प्रमाण गेल्या वर्षभरात वाढले
By admin | Updated: May 9, 2015 00:28 IST