नवी दिल्ली : २०१५ मध्ये भारतीय कंपन्या नोकर भरतीमध्ये वाढ करणार आहेत. त्याचप्रमाणे वेतनही वाढविणार आहेत. कंपन्यांनी रोजगाराच्या बाजारात एकूण तीन ते पाच लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गात १५ ते २० टक्के वाढ करण्याचे म्हटले आहे. काही पदांच्या वेतनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. असे जागतिक मनुष्यबळ समाधान कंपनीचे एआन हेविट यांनी म्हटले. या ग्रुपनुसार भारतीय कंपन्यांत २०१५ मध्ये सरासरी वेतनवाढ १०.५ टक्के होईल. ही वेतनवाढ आशियातील अनेक देशांच्या तुलनेत जास्त आहे. भारतीय कंपन्या नोकऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाकांक्षी योजना आखत आहेत. २०१४ च्या तुलनेत २०१५ हे वर्ष चांगले असेल.वेगवेगळ्या मनुष्यबळ कंपन्या आणि रोजगाराचा सल्ला देणाऱ्या कंपन्यांनुसार २०१४ मध्ये नोकऱ्यांमध्ये सरासरी वाढ १० ते १२ टक्के झाली व वेतनवाढ ८ ते १० टक्के होती. देशात ५०० संस्थांत २०१४ मध्ये सरासरी वेतनवाढ १० टक्के होती. वेगवेगळ्या उद्योगांत वेतनवाढीचा दर ८.८ ते १२ टक्क्यांदरम्यान राहिला. जागतिक सल्लागार मर्सर यांचे म्हणणे असे की, २०१५ मध्ये भारतीय कंपन्या वेतनात सरासरी ११ टक्के वाढ करतील. मावळत्या वर्षात ती १०.६ टक्के होती. स्टीमलीझ सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल सेन म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, औषध निर्माण, उत्पादन, अभियांत्रिकी आणि किरकोळ क्षेत्रात उल्लेखनीय वाढ होईल. दूरसंचार, एफएमसीजी आणि आर्थिक क्षेत्रातही नोकऱ्यांची संख्या चांगली असेल. बुद्धिमत्ता आकर्षित करणे आणि कल्पक कर्मचारी टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या वेतनवाढीशिवायही अन्य मार्गांनी प्रयत्न करतील.
आगामी वर्षात भरपूर नोकऱ्या, भरघोस पगार
By admin | Updated: December 15, 2014 03:27 IST