Join us

केंद्र सरकारच्या तांदूळ खरेदीत यंदा तब्बल २१ टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: March 3, 2016 03:52 IST

२०१५-१६ या विपणन वर्षात सरकारकडून केल्या जात असलेल्या तांदूळ खरेदीत आतापर्यंत २१ टक्क्यांनी वाढ झाली असून, सरकारने २.८४ कोटी टन तांदूळ खरेदी केला आहे.

नवी दिल्ली : २०१५-१६ या विपणन वर्षात सरकारकडून केल्या जात असलेल्या तांदूळ खरेदीत आतापर्यंत २१ टक्क्यांनी वाढ झाली असून, सरकारने २.८४ कोटी टन तांदूळ खरेदी केला आहे. कमी पावसामुळे तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवूनही आतापर्यंत चांगली खरेदी झाली आहे.भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) आणि राज्य सरकारच्या संस्था किमान समर्थन मूल्यावर तांदळाची खरेदी करतात. चालू विपणन वर्षात ३ कोटी टन तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सरकारने यापूर्वी सांगितले होते.खाद्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या संस्थांनी आतापर्यंत २.८४ कोटी टन तांदूळ खरेदी केला आहे. गेल्या वर्षी या अवधीपर्यंत हा आकडा २.३४ कोटी टन होता. ओडिया, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात तांदूळ खरेदीत उल्लेखनीय प्रगती झाली आहे.ओडिशात या अवधीत तांदळाची खरेदी १९.४ लाख टनावरून २०.४ लाख टनावर गेली, त्याचवेळी तेलंगणात ही खरेदी घटून १५.४ लाख टनावरून १०.१ लाख टन झाली.