Join us

ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनण्याची भारतात क्षमता

By admin | Updated: September 13, 2014 05:05 IST

भारत आपली तरुण लोकसंख्या व माहिती- तंत्रज्ञानाचा वाढता वापर यांच्या बळावर एक प्रमुख ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता भारतात आहे

नवी दिल्ली : भारत आपली तरुण लोकसंख्या व माहिती- तंत्रज्ञानाचा वाढता वापर यांच्या बळावर एक प्रमुख ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता भारतात आहे, असे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. तथापि, यात काही अडथळे असल्याचेही मनिला स्थित विकास बँकेने स्पष्ट केले.आशियाई विकास बँकेने ‘अभिनव आशिया : ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची प्रगती’ असे शीर्षक असलेला अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध केला. यात भारत आपली तरुण लोकसंख्या व वाढत्या माहिती- तंत्रज्ञान उद्योगांच्या मदतीने एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान पक्के करू शकते. मात्र, यासाठी नियामक, शैक्षणिक व पायाभूत सुविधांबाबतच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, असे या अहवालात म्हटले आहे.अहवालात म्हटले की, गरिबोन्मुख तंत्रज्ञान, माहिती- तंत्रज्ञानातील वाढती गुंतवणूक, आॅडिओ- व्हिज्युअल सेवांमध्ये अनुकूल स्थिती, अ‍ॅनिमेशन व अन्य उद्योगांचे आऊटसोर्सिंग केंद्र या क्षेत्रांमध्ये भारतासाठी विशेष स्थान राहणार आहे.एडीबीचे ज्ञान व्यवस्थापक व टिकाऊ विकास उपाध्यक्ष बिंदू एन. लोहानी म्हणाले, मनुष्यबळ विकास व आयसीटी सेवांमध्ये आपल्या मानवी भांडवलाचा वापर करून भारत एक प्रमुख जागतिक ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनू शकते. तथापि, उद्योगस्नेही कायदे, पायाभूत क्षेत्रातील सुधारणा, व्यापार व गुंतवणुकीतील अडथळे दूर करणे, मनुष्यबळाचा कौशल्य विकास, संशोधन व विकास यावरील खर्च वाढविणे आणि छोट्या व मध्यम उपक्रमांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे यासारख्या उपाययोजना भारताला कराव्या लागतील. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ साली करण्यात आली. ६७ सदस्य असलेल्या या संस्थेतील ४७ देश हे आशियातील आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)