भवरीदेवींचे दु:ख ऐकून श्रोत्यांच्या अंगावर शहारे
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST
सजग महिला संघर्ष समितीकडून आयोजित कार्यक्रम
भवरीदेवींचे दु:ख ऐकून श्रोत्यांच्या अंगावर शहारे
सजग महिला संघर्ष समितीकडून आयोजित कार्यक्रमऔरंगाबाद : बालविवाह रोखल्याचा राग मनात ठेवून उच्चवर्णीय समाजातील पाच जणांनी केलेले अत्याचार आणि त्यानंतर दिलेला लढा, याविषयीचे भवरीदेवींचे अनुभव ऐकताना तापडिया नाट्यमंदिरात उपस्थितांच्या अंगावर काटा आला. हृदय पिळवटून टाकणार्या या निंदनीय घटनेनंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर केंद्र सरकारला कामाच्या ठिकाणी महिलांवर होणार्या अत्याचारांना प्रतिबंध करणारा कायदा आणावा लागला.सजग महिला संघर्ष समितीतर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे भवरीदेवी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भवरीदेवी, त्यांच्या सहकारी लाजवंतीदेवी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ताराबाई लड्डा, चंदाबेन जरीवाला यांच्या हस्ते मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर सजग महिला संघर्ष समितीच्या प्राचार्या मनोरमा शर्मा, मंगल खिंवसरा, अनुराधा कांबळे, चंद्रभागाबाई दाणे, पद्मा तापडिया, डॉ. जयश्री गोडसे, डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. सविता पानट उपस्थित होत्या. भवरीदेवी यांनी सांगितले की, मी राजस्थानमधील भटेरा येथील रहिवासी असून, तेथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. १९९२ मध्ये राजस्थान सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा केला आणि या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले होते. गावात बालविवाह होत असल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली. अधिकार्यांनी गावात जाऊन तो बालविवाह रोखला होता. गावातील उच्चवर्णीय लोकांनी याबाबत भवरीदेवीला दोषी धरून त्यांच्यावर राग धरला. त्यानंतर एकेदिवशी त्यांच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर त्यांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.वैद्यकीय तपासणी करण्यास अधिकार्यांनी मुद्दामहून लावलेला विलंब, तसेच केस मागे घ्यावी यासाठी गावातील आणि त्यांच्याच समाजातील पंचांनी त्यांच्यावर टाकलेला दबाव त्यांनी झुगारून लावला. त्यावेळी विशाखा नावाची स्वयंसेवी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांनी हे प्रकरण लावून धरले, त्यासंबंधी वर्तमानपत्रांमध्ये बातम्याही झळकल्या. त्यानंतर खटला न्यायालयात गेला. निकाल जाहीर होईपर्यंत पाच न्यायाधीश बदलले. तोपर्यंत दोन आरोपींचे निधन झाले. हे अनुभव सांगत असताना भवरीदेवी आणि उपस्थित श्रोत्यांचेही डोळे पाणावले होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना भवरीदेवी यांनी उत्तरे दिली. (जोड आहे)