Join us

आशियायी बँकेने भारताचा वृद्धीदर घटविला

By admin | Updated: September 22, 2015 21:59 IST

आशियायी विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षाचा विकास दराचा अंदाज ७.८ टक्क्यांवरून घटवून ७.४ टक्के केला आहे.

नवी दिल्ली : आशियायी विकास बँकेने भारताचा चालू आर्थिक वर्षाचा विकास दराचा अंदाज ७.८ टक्क्यांवरून घटवून ७.४ टक्के केला आहे. यंदाचा कमी पाऊस, परदेशातून कमी मागणी आणि संसदेत आर्थिक सुधारणा घडवून आणणारी विधेयके संमत करून घेण्यात सरकारला आलेले अपयश ही कारणे आशियायी विकास बँकेने दिली आहेत.या संस्थेने ‘आशियाच्या विकासाचे दृश्य’ या ताज्या अहवालात भारतात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ४ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त (०.२ टक्के कमी-जास्त) असण्याचा अंदाज कायम ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा महागाईवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अहवालात भारताच्या विकास दराबाबत सुधारणा करण्यात आली आहे. चालू वित्तीय वर्षासाठी बँकेने ७.८ असा वृद्धीदराचा अंदाज वर्तविला होता; मात्र त्यात ०.४ टक्क्यांनी घट करून तो ७.४ टक्के राहील असे म्हटले आहे. २०१६-१७ मध्ये हा वृद्धीदर वाढून ७.८ टक्के होऊ शकतो, असेही हा अहवाल म्हणतो. यापूर्वी एडीबीने मार्च १५ मध्ये चालू वित्तीय वर्षात भारताचा विकास दर ७.८ टक्के, तर १६-१७ मध्ये ८.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.