लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आॅनलाईन आर्थिक व्यवहारांना गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना सामान्य ग्राहक मात्र अजूनही आॅनलाईन व्यवहाराकडे वळायला तयार नसल्याचे चित्र देशात आहे. एका सर्वेक्षणानुसार, ९0 टक्के ग्राहक आजही आॅनलाईन व्यवहार करण्याऐवजी बँक शाखांना प्राधान्य देत आहेत. ओरॅकल आणि जे. डी. पॉवर इंडियाने ‘रिटेल बँकिंग स्टडी’ नावाचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या १२ महिन्यांत ९४ टक्के रिटेल बँकिंग ग्राहकांनी बँक शाखेला किमान एकदा भेट दिली आहे. अमेरिकास्थित मार्केटिंग इन्फॉर्मेशन सेवा संस्था जे. डी. पॉवरचे वरिष्ठ संचालक गॉर्डन शिल्ड्स यांनी सांगितले की, बहुतांश बँकिंग सेवांसाठी ग्राहक बँकांना प्राधान्य देत असले तरी बँकांना डिजिटल होण्यात खूप संधी आहेत. ५१ टक्के रिटेल ग्राहकांचा आॅनलाईन बँकिंगचा अनुभव चांगला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २0१७ या काळात भारतातील १४ राज्यांतील ५,३६८ बँक ग्राहकांशी बोलून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातील बँकांचा त्यात समावेश आहे. आॅनलाईन बँकिंग निर्देशांकात भारताला ६७२ अंक मिळाले आहेत. चीन (८0६), अमेरिका (७९३) आणि आॅस्ट्रेलिया (७४८) या देशांच्या तुलनेत भारत खूप मागे आहे.वित्तीय सेवा क्षेत्रातील संस्था ओरॅकलचे औद्योगिक नाविण्य सल्लागार किरण कुमार केसवरापू यांनी सांगितले की, भारत सरकारने डिजिटीकरणासाठी प्रयत्न चालविले असले तरी जमिनीवरील वास्तव अगदीच भिन्न आहे. आॅनलाईन व्यवहाराशी संबंधित सुरक्षाविषयक बाबीमुळे लोक डिजिटल व्यवहारांकडे वळायला घाबरत आहेत. वास्तविक या समस्येवर सहजपणे आणि लवकरात लवकर तोडगा काढता येऊ शकतो.
९0 टक्के बँक ग्राहकांचे व्यवहार आॅफलाइनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 00:36 IST