कोलकता : भारतात सरकारचे प्रतीक म्हणून एकेकाळी जनमानसावर अधिराज्य गाजविणारी अॅम्बॅसिडर कार इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. या कारचे उत्पादन सध्या तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले आहे. तथापि, उत्पादन पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याने अॅम्बॅसिडरच्या उत्पादनाला कायमस्वरूपी पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान मोटर्स या कंपनीकडून ही कार उत्पादित केली जाते. प. बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील उत्तरपारा येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प आहे. या प्रकल्पातील काम कंपनीने थांबविले आहे. गेल्या सात दशकांपासून भारतीय समाजजीवनाचा एक भाग असलेल्या गाडीची चाकेही आता कायमची थांबण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, उत्तरपारा येथील हा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून प्रचंड आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे उत्पादन बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. या कारखान्यात सुमारे अडीच हजार कामगार-कर्मचारी आहेत. उत्पादन थांबविण्याच्या निर्णयाविरोधात ते आंदोलन करण्याची शक्यता आहे. काम बंद असल्याने या कर्मचार्यांना आता वेतन मिळणार नाही. एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, कंपनीसमोर आर्थिक संकट आहे. प्रकल्प बंद केल्याने कंपनीच्या संकटात थोडी कपात होईल. कोणी गुंतवणूकदार पुढे आल्यास येथे सुधारणा होऊ शकते. अलीकडे या गाडीची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात कंपनीला ८० कोटी; तर डिसेंबर २०१३ पर्यंत ४० कोटी रुपयांचा तोटा झाला, असे या अधिकार्याने सांगितले. प. बंगाल सरकार या प्रकरणी कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्थमंत्री अमित मित्रा यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)
अॅम्बॅसिडर होणार इतिहासजमा!
By admin | Updated: May 26, 2014 00:38 IST