Join us

त्सुनामीनंतर गरज आहे बाजाराला सावरण्याची

By admin | Updated: August 30, 2015 22:00 IST

जगभरातील शेअर बाजारांमधील घसरणीनंतर सोमवारी भारतीय बाजारात आलेल्या त्सुनामीनंतर आता बाजाराला सावरण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. बाजाराच्या घसरणीमुळे

प्रसाद गो. जोशीजगभरातील शेअर बाजारांमधील घसरणीनंतर सोमवारी भारतीय बाजारात आलेल्या त्सुनामीनंतर आता बाजाराला सावरण्यासाठी आधार देण्याची गरज आहे. बाजाराच्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणुकदारांमध्ये घवराट असली तरी त्यांना दिलासा देऊन खरेदीसाठी ही उत्तम वेळ असल्याचे पटवून देण्याची गरज आहे. यासाठी अर्थतज्ज्ञांनी भूमिका बजावणे गरजेचे आहे. चीनमधील उत्पादनामध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम जागतिक मंदीमध्ये होण्याची भीती व्यक्त होऊ लागल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. त्याचा परिणाम भारतातील बाजारावर होऊन सोमवारी निर्देशांक १६०० अंशांहून अधिक घसरला. परकीय वित्तसंस्था या घसरणीला आणखी हातभार लावत आहेत. घसरत्या बाजारात या संस्थांनी मोठी विक्री केल्याने बाजारात त्सुनामी आली. या आपत्तरमधून बाजार काहीसा सावरतानाचे आशादायक चित्र सप्ताहाच्या अखेरीस दिसून आले. सलग तिसऱ्या सप्ताहात बाजाराचे निर्देशांक खाली आले. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ९७५ अंश म्हणजे ३.६ टक्के घसरला. हा निर्देशांक २६३९२.३८ अंशांवर बंद झाला. निफ्टी २९८ अंशांनी घसरून ८००२ अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी २६ आणि आठ हजारांची पातळी राखल्याने गुंतवणुकदारांना भावनिक पातळीवर काहीसा दिलासा मिळाला आहे. चीनमधील उत्पादन कमी होत असल्याने आणि बाजार घसरत असल्याने चीनच्या सरकारने बॅँकींग उद्योगाला काही प्रमाणात सवलती दिल्याने आता चीनची अर्थव्यवस्था काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्यासाठी किती काळ जाणार आणि गुंतवणुकदार कसा प्रतिसाद देणार यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. अमेरिकेमधील रोजगार निर्मितीचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर या देशाचे एकूण देशांतर्गत उत्पादनही अपेक्षेहून अधिक प्रमाणात वाढले आहे. असे असले तरी जागतिक बाजारातील मंदीमुळे पुढील महिन्यात व्याजदरामध्ये वाढ न करऱ्याचे संकेत अमेरिकेन दिले आहेत.